सकाळच्या बॅचची सुरुवात
माध्यमिक गटातल्या मुलींची शाळा सकाळी तर मुलांची शाळा दुपारी असते. सायंकाळी मुलं अभ्यासाला कंटाळतात. मुली मात्र दुपारी घरी जाऊन, जेवून ताज्यातवान्या होऊन खेळघरात येतात. हायस्कूलच्याही शाळा काही मुलांच्या सकाळी तर काहींच्या दुपारी आहेत. खेळघराची वेळ तीननंतरची होती त्यामुळे दुपार शाळेतल्या मुलांवर अन्याय होतोय असे वाटले. म्हणून खेळघर आणि आनंदसंकुल दोन्ही जागी सकाळचे वर्ग सुरू केले.
खेळघरात हायस्कूलच्या मुला-मुलींच्या सकाळच्या वर्गाची जबाबदारी वाटून घेतली. आनंदसंकुलमधल्या सकाळगटाची जबाबदारी रेशमा लिंगायतने घेतली. आठवी ते दहावी गटाला औपचारिक अभ्यासातल्या मदतीची गरज अधिक असते. या गरजेनुसार सकाळी इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल असे वर्ग सुरू झाले.