या सगळ्या प्रयत्नांमुळे मुलांची संख्या वाढते आहे. सध्या ती १५० एवढी आहे. खेळघराची जागा मध्यवस्तीतली आणि लहान आहे. एकाच गटातील मुलांच्या वयात फार फरक असेल तर काही ऍक्टीव्हिटी घेणे कठीण होते.
या सगळ्या कारणांनी पूर्वीच्या खेळघराच्या उस्फूर्त आणि त्यामुळे काहीशा सैल पद्धती बदलून अधिक नेटकी घडी बसवणे आवश्यक होते.
त्यासाठी इयत्तेनुसार आम्ही मुलांचे वेगळे गट करून त्या गटासाठीची जागा व वेळ निश्चित केली. एकेका गटाची संपूर्ण जबाबदारी एकेका ताईने घेतली. मुलांच्या अभ्यास संकल्पना, जाणिवांचा विकास याबरोबरच एकूण त्यांच्या शिक्षणाच्या वाटेत येणारे सारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न होतो. पालक, शिक्षक, शेजारी, मुलांची मित्र मंडळी, वस्तीतली दादा-भाई अशा सर्व संबंधित लोकांशी त्यासाठी ताईंना संवाद ठेवावा लागतो.